आशा!!!!......ज्यांच्या नावातच चैतन्य आहे अशा मधाळ आवाजाच्या गायिका आशाताई भोसले यांचा आज वाढदिवस . आपल्या भारतदेशाला लाभलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वांपैकी एक लाघवी आणि हवंहवंसं माणूस म्हणजे आशा ताई. नाच रे मोरा...सारख्या निरागस बालगीतापासून तर अगदी -भोगले जे दुःख ज्याला सुखं म्हणावे लागले...... या अगदी हृदयद्रावक गीताला आपल्या स्वरांचे कोंदण देणाऱ्या आशाताई आपल्या मनावर राज्य करतात .एकाच वेळी अनेक रूपं घेण्याची जादूच जणूं त्यांच्यामध्ये आहे. कुठलेही पात्रं असो की प्रसंग , ते गाणं आशाताई इतकं बेमालूमपणे गातात की ते पडद्यावरची व्यक्तीच गाते आहे असं वाटावं . त्यांचं हे गाण्यात विरघळून जाणं मनाला फार फार भावतं!!!!!
खरंतर त्यांना रंगमंचावर लांबूनच बघितलंय अणि एरवी दूरदर्शनवर पण त्यांच्या जादुई आवाजामुळे ,दिलखुलास हसताना पडणाऱ्या खळीमुळे आणि नर्म विनोदी संवादशैलीमुळे अगदी आपल्या होतात. इतक्या अतूलनिय गायिकेबद्दल लिहिण्याची माझी योग्यता ती किती पण हे आतलं मनात साठलेले ....
फक्त गायिका म्हणूनचं नव्हे तर आयुष्य भरभरून जगण्याची ओढ ही आशाताईंना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते.
एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी ...... या गाण्याचा सोहळा करणाऱ्या आशा ताईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा....
भरती वाळुंज --कपटकर
8-9-2019