लय आणि ताल यांचा सुरेख मिलाफ म्हणजे 'लतादीदी'.
चिरतरुण आवाजाची देणगी मिळालेल्या लतादीदी म्हणजे सात्विकतेचे मूर्तिमंत उदाहरण.
मंदिरातल्या घंटेचा नाद हा जितका सुमधुर तितकाच त्यांचा आवाजही.एखाद्या रम्य पहाटे शृभ्र वस्त्र परिधान करून, कुंकम लावलेली ललना मंदिराच्या पायऱ्यांंवर उभी असताना जितकी ओजस्वी दिसते न अगदी तसं मला दिदींंच गाणं वाटतं.
लतादीदींच्या आवाजाची जातकुळीच वेगळी.कितीही वरच्या सुरात अगदी टिपेलाही तो कानाला इतका गोड लागतो की बस्स!!! वादळवरं सुटलं गं - या गाण्यातली तान,किती सुरेख!!! तसेच त्यांचे गातानाचे श्वासावरचे नियंत्रण ही जादूच
आहे की काय असं वाटावं. त्यांच्या एकाही गाण्यामध्ये श्वास ऐकू येत नाही. "हम आपके है कोन " या चित्रपटातली गाणी गायली त्यावेळी त्यांचे वय अवघे 65 होते. चॉकलेट लाईमज्यूस
हे गाणे तर वय विसरून त्या गायल्या आहेत.... लतादीदींच्या सुरांचा परिसस्पर्श लाभलेली असंख्य गाणी ,उल्लेख करावा तरी किती गाण्यांचा?
भय इथले संपत नाही या गीतामधील त्यांचा स्वर शहारे आणतो तर निजल्या तान्ह्यावरी माऊली हे गाणे वात्सल्याचे प्रतीक.
मोगरा फुलला आणि पसायदान जणू ज्ञानेश्वर महाराजांंनी स्वतः त्यांच्याकडून गाऊन घेतले आहे, इतक्या त्या गाताना एकरूप होऊन गायल्या . अगदी अलीकडे वयाच्या 90 वर्षापर्यंत त्या गायल्या आहेत."आता विसाव्याचे क्षण" हे त्यापैकीच एक गाणे.
जगातील अनेक आश्चर्यांपैकी एक आपल्या दिदींचा आवाज असला तरी त्यांचा जीवनप्रवास बघता हा फक्त दैवी चमत्कार नाही तर अगदी खेळण्याच्या वयापासून केलेल्या अपरिमित कष्टांचा आणि साधनेचा तो परिपाक आहे.
इतक्या उंचीवर पोहोचण्यासाठी केलेला प्रवास हाच मुळी चमत्कार म्हणावा लागेल.
लतादीदींबद्दल नुसते बोलण्यासाठी सुद्धा साधना करावी लागेल याची जाणीव मला आहे.त्यांच्यावरील माझे प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस माझ्या मदतीला धावून आला हेच खरे.आपण खूप भाग्यवान आहोत की अशी गायिका आपल्या देशाला लाभली.
ज्यांच्याबद्दल ऊर अभिमानाने भरून येतो अश्या भारतरत्न दिदींना विनम्र अभिवादन!!!!!!!!
भारती वाळुंज-कपटकर
28 /9/2020